वसंत व्याख्यानमाला हे महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक जीवनाचे होकायंत्र   

प्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन 

पुणे: न्यायमूर्ती रानडे युगातील प्रार्थनावादी व्याख्यानमाला टिळक युगात राष्ट्रनिष्ठ झाली. गांधीयुगात स्वातंत्र्यसन्मुख झाली आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर तिने नवभारताच्या उत्कर्षाचे स्वप्न पाहिले. हा प्रकृतिभेद परिस्थितीनिरूप असला तरी ज्ञानप्रसार आणि विचार जागृतीचा पाया कायम राहिला. प्रादेशिक उत्कट अभिमानापोटी देशातील व्यापक प्रश्नांंकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी वसंत व्याख्यानमालेने आजवर घेतली. मराठी समाजमानस समृद्ध करणारी वसंत व्याख्यानमाला हे महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक जीवनाचे होकायंत्र आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी वसंत व्याख्यानमालेत व्यक्त केले. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘विचारांचा वसंत फुलविणारी व्याख्यानमाला’या विषयावर प्रा. मिलिंद जोशी यांनी काल १४ वे पुष्प गुंफले. वसंत व्याख्यानमाला हे मुक्त ज्ञानसत्र असल्याने ते सर्व मतांच्या, पंथांच्या आणि जातीधर्माच्या लोकांना विचार मांडण्यासाठी खुले असावे. कोणताही विषय किंवा अभिरुची वर्ज्य असू नये अशी न्यायमूर्ती रानडे यांची भूमिका होती. तिला अनुसरून व्याख्यानमालेची १५० वर्षे वाटचाल सुरू आहे. देशात घडलेल्या घटनांचे साद पडसाद व्याख्यानमालेत नेहमीच उमटत राहिले. इंग्लंडची ओळख जशी मदर ऑफ पार्लमेंट्स आहे तशीच वसंत व्याख्यानमाला ही सर्व व्याख्यानमालांची जननी असल्याचेही प्रा. जोशी यांनी नमूद केले. वसंत व्याख्यानमालेच्या वैभवशाली परंपरेचा सविस्तर आढावा घेणारे हे व्याख्यान अनेक अर्थाने वेगळे ठरले. 
 
प्रा. जोशी म्हणाले, वसंत व्याख्यानमाला हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. ग्रंथांचा उदय होण्यापूर्वी वक्तृत्वाने फिरती ज्ञानपोई चालवली. आजच्या समाजातील सर्व विषय भावनिक आणि अकारण अतिसंवेदनशील झाले आहेत, त्यामुळे तर्कशुद्ध विवेचनाला अर्थ उरला नाही. कोणत्या गोष्टीमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातील ते सांगता येत नाही. ज्ञानक्षेत्राला व्यक्ती आणि विचार विद्वेषाच्या ग्रहणाने ग्रासले आहे. 
 
वैचारिक क्षेत्रात वक्तृत्वाची ही अवस्था तर राजकारणात अर्थहीन उदंड वक्तृत्व रान माजवते आहे. एके काळी समाजाचे नेतृत्व करणारे नेते उत्तम साहित्यिक, विचारवंत, तत्त्वज्ञ आणि वक्ते होते. त्यांची वाणी समाजाला आणि देशाला दिशा दाखविणारी होती. आज तो वाग्विलास उरला नाही. व्यासपीठावरील चिंतनशील वक्तृत्वाची आज हानी होताना दिसत असली तरीही नेटक्या बोलण्याचे महत्व थोडेही कमी होणार नाही. बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही बोलण्यातून भाषा, साहित्य, संस्कृती यांचे आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते. त्यामुळे वाचिक अभिव्यक्तीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले. 

राज्याच्या स्थापनेत व्याख्यानमालेचे योगदान 

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समित्यांचे अहवाल महाराष्ट्राच्या मागणीला प्रतिकूल असल्याने मराठी मने प्रक्षुब्ध झाली होती. वसंत व्याख्यानमालेने हा प्रश्न वैचारिक पातळीवरून मांडण्यास जो आरंभ केला तो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपर्यंत सुरु होता. त्यामुळे चळवळीतही लोकांचे वैचारिक भरण पोषण करण्याचे काम वसंत व्याख्यानमालेने केले असल्याचे प्रा. मिलिंद जोशी यांनी स्पष्ट केले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या कार्यकारिणीचे सदस्य स्वप्निल पोरे यांनी प्रा. मिलिंद जोशी यांचा सत्कार केला. संजय ऐलवाड यांनी सुत्रसंचालन केले. 

व्याख्यानमालेची विद्यापीठ उभारणीसाठी देणगी 

सन १९४९ मध्ये एका व्याख्यानाच्या तिकीटविक्रीचे सर्व उत्पन्न पुणे विद्यापीठाच्या मदतीसाठी वसंत व्याख्यानमालेने दिले. हे व्याख्यान प्रा. ना. सी. फडके यांचे होते. अध्यक्ष दत्तो वामन पोतदार होते. हे व्याख्यान मदतीसाठी असल्याने पदाधिकारी देखील तिकीट काढून आले होते. फडके पोतदार यांनी गाजवलेल्या या व्याख्यानाचे उत्पन्न ६०१ रुपये होते. त्यात संयोजकांनी ४०० रुपयांची भर घालून १००१ रुपयांची देणगी पुणे विद्यापीठाला दिली आणि ज्ञानपीठ हे नाव सार्थ केले. अशी आठवणही प्रा. मिलिंद जोशी यांनी यावेळी सांगितली. 
 

Related Articles